रविवार, ३१ ऑक्टोबर, २०१०

` डोक्यालिटी `

             सुट्यांचा मौसम होता. निरर्थक हॉलीवड्पट पाहण्यापेक्षा गाडीला किक मारून रायरेश्वर ला जाण्याचा चंग बांधला होता. मग काय ! मी आणि मयूर दोघेच यावेळी रायरेश्वर-केंजळगड जायचे ठरले. हा बेत ऐनवेळी म्हणजे जायच्या दिवशीच ठरला होता. शनिवारी सकाळी पोटोबाला खुश करून आम्ही भोर कडे कूच केली.नऊ वाजले निघता निघता. साधारण १०० मैलांचे अंतर कापायचे होते. जाताना खेड-शिवापूरला नेहमीप्रमाणे कैलासमध्ये मिसळ आणि मटकी भेळीवर ताव मारला. त्या दिवशीही अमाप गर्दी होती होट्लात.

      भोरला जाईस्तोवर मध्यान: व्हायला आली होती. भोरला आले की पहिला महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. महाराजांना वंदन करून भोरमध्ये न थांबता आम्ही थेट कोरले-रायरेश्वर पायथ्याकडे निघालो. कोरले गावाच्या फाट्याला लागल्यावर वाहनांची गर्दी कमी होऊन रस्ता निर्मनुष्य दिसू लागला होता. रस्त्याच्या डावीकडे रोहीडा साद घालत होता. रायरेश्वर अजून नजरेत येत न्हवता. साधारण पाउण तासाभरात आम्ही गावाच्या अलीकडे पोहोचलो असेल. पुढचा रस्ता पार कच्चा होता. आणि न व्हायचे तेच झ्हाले !

            गावाच्या साधारण एक मैल आधी आमची फटफटी झ्हाली पंक्चर !! आता, भर दुपारच्या उन्हात आडगावात फटफटी पंक्चर म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. आजूबाजूला कोणी दिसतही न्हवते. कोणाला विचारायचे म्हणजे गैरसोय. थोडे पुढे तशीच गाडी फरफटत(!) आणावी लागली. समोरून आजोबा येताना दिसले, जीवात जीव आला आमच्या. पण पुढच्याच क्षणी जीव पुन्हा जातोय का काय असे झ्हाले. आजोबा म्हंटले,'' काय र पोरहो, काय करताय इकड ?" मी," आजोबा, रायरेश्वर ट्रेक ला आलोय, पण गाडी पंक्चर झ्हालीये, रायरेश्वर किती लांब आहे अजून? " आजोबानी लगेच समोर हाताने रायरेश्वर कडे खुणावून दाखवत गावात पंक्चर काढण्याचे एकही दुकान नसल्याचे सागितले.


            आइ शप्पथ आता पुरती विल्हेवाट लागायाची पाळी आली. नशीब, रायरेश्वर पायथ्याला तरी पोहोचलो होतो आम्ही. डावीकडे केंजळगड तर उजवीकडे रायरेश्वर हाक देत होते पण काय करणार ? विचारातून बाहेर येत मी समोर पाहिले; आजोबा पुढे म्हणाले, पुढ गावात सायकल पंक्चर काढणारा एक इसम मिळेल, तुम्हाला काही मदत करू शकला तर पहा. अस म्हणून ते बाजूच्या वाटेने शिवारात निघून गेले. आमच्यासमोर दुसरा काही पर्याय न्हवता. पुन्हा त्याच कच्या वाटेने फटफटी ढकलत गावात आणली. सायकल पंक्चर काढायचे दुकान कुठे ? मयूरने गावात खेळणाऱ्या पोरांना दुरूनच विचारले. पडयालल्या लाइनतल्या कोपऱ्याचे पहिले घर, लगेच एका पोराचा रीप्लाय.



              आता पूर्ण मी घाम्याघुम होऊन त्या घरापाशी पोहोचलो. 'आहे का कोणी इथे? 'मयूर. आतून तिशी ओलांडलेले एक गृहस्थ आले. आम्ही,' पंक्चर कुठे काढून मिळेल ?' त्यांनी गाडी बाजूला लावायला सांगितली. पुढे जे काही होणार होते त्याची मी कल्पनाही केली न्हवती. पंक्चर काढणारे काका म्हणाले,' गावात गाडीचे पंक्चर काढायची व्यवस्था नाही'. आम्ही सायकल पंक्चर ला लागणारे हत्यारे ठेवतो. बोला काय करायचे ? पंक्चर काढा-आम्ही म्हणालो. विचार करा, त्यांच्याकडे हिटर, कॉम्प्रेसड एयर, स्पेशल ग्लू, रबर स्टिक ही बेसिक साधनसामुग्री नसताना त्यांनी आम्हाला पंक्चर काढून दिले.


               त्यांच्या कडची साधनसामुग्री होती, सायकल च्या चाकातली हवा भरायचा पंप, पाना, चिकटपट्टी सदृश स्टिकी गोल आणि पुरे पूर मदतीची इछा ! पंक्चर काढून झ्हाल्यावर काकांनी आम्हाला भोरला इथूनच परत जायचा सल्ला दिला. कारण एकतर गाडीचे हे शास्त्रशुद्ध पंक्चर काढलेले नाही हे त्यांनी मान्य केले होते, गाडी पुन्हा पंक्चर होऊ शकते. आणि दुसरे वर किल्यावर जाणारा रस्ता पारच खडकाळ आहे अस ते म्हणाले. इतक्या लांबून इतक्या जवळ येऊन आम्ही काही परतणार न्हवतो. काकांना थ्यांक्यू म्हणत गावातून आम्ही गाडीवर बसूनच सावकाश पुढे निघालो.


             गावातून वर म्हणजे गडावर जायला दोन रस्ते आहेत. दोन्ही पुरते खडकाळ. आम्ही वर जाताना रायरेश्वर कडच्या रस्त्याने वर आलो. आल्यावर गाडी पार्क करून रायरेश्वर शिडी मार्गाच्या पाशी पोहोचलो. दुपारचे तीन वाजले होते.फोटोगिरी सुसाट चालू होतीच. पूर्वी शिडी मार्ग न्हवता इथे. दगडाच्या खोबणीत हात-पायांची कसरत करत चढायला लागायचे. भोर आणि मुख्यत्वे रायरेश्वर ला इतिहासात फार मोलाचे स्थान आहे. भोर ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तर रायरेश्वरवर इथे शिवमंदिरात शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ आपल्या मावळ्यानबरोबर घेतली होती.

   
              आम्ही शिडीमार्गाने वर आल्यावर थेठ शिवमंदिरात गेलो. शिव शम्भुनसमोर नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण केले. रायरेश्वर किल्ल्यावर तुरळक लोकवस्ती आढळते. हे लोक शेती आणि गुरे पालनाचा व्यवसाय करतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे रायरेश्वर चे विस्तीर्ण पठारच आहे, सहा एक मैल त्याचा विस्तार असावा. किल्ला म्हंटला तरी तटबंदी आलीच. रायरेश्वर ला बुरुज किवा तटबंदी दिसत नाहीत. वर शाळाही आहे. इथे मंदिरात राहायची तर खालून गावातून खाण्याची व्यवस्था होऊ शकते. वर चिक्कार पाणी आहे. आणि हो, पांडवलेणी ही आहेत किल्ल्यावर. पावसाळ्यात हे पठार फुलांच्या गालिच्याने भरून जाते. इथून तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, वज्रगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड दृष्टीस पडतात. गोमुख तळे, अस्वलखिंड, भेक्राचा माळ ही आणखी काही किल्ल्यावरची पाहण्यासारखी ठिकाणे.


           शाळेबाहेरच्या कट्यावर आम्ही भेळ चापत निघायचं ठरवल. साडे चार वाजले होते. आम्ही केंजळगडाला वेळेअभावी जाऊ शकलो नाही. मात्र उतरताना केंजाळ गडाकडल्या रत्याने पुन्हा एकदा कोरले गावात आलो. आणि काय आश्चर्य पुन्हा एकदा आमची फटफटी पंक्चर ! यार अब तो हद हो गयी थी. पुन्हा पंक्चर वाल्या काकाकडे जाऊन पंक्चर काढावे लागले. यावेळी मागचे चाक पंक्चर होते. पण काही म्हणा ही जी काय गावरान डोक्यालिटी होती पंक्चर काढायची ती खरच अफलातून !!! नाहीतर आमच्या सारख्या भटक्यांचे काय झ्हाले असते कुणास ठाऊक ??? आता मात्र काकांना सलाम करत पुण्याचा रस्ता धरला.

            जाताजाता आम्ही आंबवडे ला जीवा महल समाधी पाशी गेलो.गावकऱ्यांनी स्वखर्चातून समाधी व्यवस्थित ठेवल्याचेपाहून उर भरून आला. समाधी समोर नतमस्तक होत मनातल्या मनात शूरवीर जीवा महालांचा प्रताप आठवत आम्ही निघालो. आंबवडेलाच स्थापत्यकलेचा नमुना असेलेला ब्रीटिशकालीन ससपेनशन ब्रिज ही पाहिला. सात वाजले होते संध्याकाळचे.


~ ~ ~ ~ ~ ~ दोन पंक्चर झ्हाले. पन्नास रुपये......ओ सायेब कसला विचार करताय ? अ...अ कसला नाही म्हणत पन्नासची नोट मी पंक्चर काढणाऱ्या पोराच्या हातावर थापत रायरेश्वर आठवणीतून बाहेर येत गाडीला किक मारली आणि घराकडे कूच केली..

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

` लिमिटेड माणुसकी `

          स्वातंत्र्य दिनी आम्ही शाळेत बऱ्याच वर्षांनी एकत्र आलो होतो. त्याच दिवशी दुपारनंतर मी आणि रोहितने पुण्यापासून साठेक कि.मी असलेल्या वज्रगड ट्रेकचा मनसुबा आखला होता. सकाळी अकराच्या आसपास आम्ही दुचाकीवरून नारायणपुराकडे कूच केली. जाताना अगदी बेफाम वेगात तासाभरात केतकावळीच्या जवळ असलेल्या छोट्याश्या पंचशील हॉटलाला धडक मारली. तिथे मिसळ चापून पुढचा रस्ता धरला. कालच पाउस पडून गेला होता, आज मस्त उन होते. घाटाच्या अलीकडे मनमुराद फोटोगिरी करायला दुचाकीवरून आम्ही उतरलो. काही वेळ फोटोगिरी करून पुन्हा पुढे निघालो.

         पाऊण तासात नारायाणपुरला आलो. समोर पुरंदर आणि वज्रगड ज्याला रुद्रमाळ असेही म्हणतात ते दिसत होते. सुट्टीचा दिवस होता, नारायाणपूर तुडुंब भरून वाहत होते. आम्ही गावातला रस्ता न धरता सरळ मुख्य रस्त्याला लागलो. पाहता पाहता दहा मिनिटात पुरंदरच्या मुरारबाजी देशपांडेच्या पुतळ्या पाशी येऊन पोहोचलो. सिंहगड पाठोपाठ पुरंदर सिमेंटाधीन झ्हाला हे माहीतच न्हवते मला.दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळी वर जायला पायवाट आणि कच्चा रस्ता होता. आता मात्र चांगला दोन चारचाकी वाहने जातील इतका मोठा डांबरी रस्ता पाहून उगीचच वाईट वाटले.

         वज्रगड किल्ला निम्याहून अधिक पुणेकरांना माहित नसल्याने आम्ही इकडे कमी जत्रा गृहीत धरली पण झ्हाले उलटेच. त्या दिवशी भयंकर वर्दळ होती. सासवड, पुणे, जेजुरी आणि आसपासच्या प्रदेशातली मंडळी दिसत होती. आता काय रस्ता झ्हालाय म्हंटल्यावर उठला की सुटला ! बाजीप्रभुना नमन करत डाव्या बाजूने आम्ही वज्रगडाकडे निघालो. पुरंदर आणि वज्रगड ही किल्यांची म्हंटल तर जोडगोळीच. त्यात पुरंदरला विशेष ऐतिहासिक महत्व. पुरंदरचा तह सर्वज्ञात . पण वज्रगड याचा इतिहासात पुरंदरच्या जवळचा किल्ला इतकाच उल्लेख. दुपारचे एक वाजून गेले होते.

         अनेक तरुण मुल - मुली, कुटुंबे याची गर्दी वाढत होती. मनाला पाहिजे तशी ही सर्वजण वागत होती. कोणी गाडी पार्क न करता सरळ निषिद्ध जागेत घुसवत होती. कोणी मनमुराद शिव्या एकमेकास देत होती. त्यांचाकडे कानाडोळा करत आम्ही आणखी अर्ध्या तासात वज्रगडाच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचलो. त्या काळ्या पाषाणात साकारलेल्या दरवाजापाशी पोहोचल्यावर हायसे वाटले. तिथेही काही टाळकी टिंग्या टवाळक्या करण्यात व्यस्त होती. थेठ वर आल्यावर पुरंदरचा पूर्ण किल्ला नजरेत भरतो.

          आणखी वज्रगडाच्या खालच्या बाजूस गेले की दोन बुरुज आणि तीन पाण्याची टाकी दिसतात. पहिल्या बुरुजावर पत्यांचे खेळ आणि कर्णकर्कश्श आवाजात देशभक्तीपर गीते ( १५ ऑगस्ट ) वजा अपभ्रंशीत करत बिनधास्त काही टाळकी पहाडली होती. दुसरा बुरुज बराच खाली असला कारणाने सुदैवाने तिकडे कोणी फिरकले न्हवते. इथेच वज्र हनुमानाचे आणि भगवान शंकरांचे मंदिर आहे.देवळात पाया पडून परत जायला निघालो. किल्यावर बाकी विशेष अवशेष दिसत नाहीत. मोठ्या खडकाचा बालेकिल्ला सदृशः असा भाग किल्ल्यावर भाग दिसतो. तिकडे काही टाळकी साहसी कृत्ते करण्यात मग्न होती. दूरवर नीरा नदीचे लांबच लांब पसरलेले पात्र दिसत होते. तो नजारा अप्रतिम होता.

          दुपारचे तीन वाजून गेले होते. रोहितला परत सात वाजता घरी पोहोचायचे होते. उतरून पुरंदरवर जायचे मनात न्हवते पण दीड तासाभरात पुरंदर भटकंती करून खाली नारायणपूर च्या दत्त मंदिरात पाचच्या आसपास पोहोचलो. दत्त माउलीस दंडवत घालून मनातल्यामनात सर्वांना सत्बुद्धी लाभो अशी प्रार्थना करत पुण्याकडे प्रस्थान केले. अनेक विचारांनी माझा तरीही पाठ लाग सोडला न्हवता ...

असतो एकेकाला नाद सुट्टी मनसोक्त साजरा करण्याचा, म्हणून काय इथे कसेही उन्मत्त वागायचे;

असतो एकेकाला नाद इतिहासाचा, म्हणून काय इथे येऊन ऐतिहासिक वारस्याला नावे ठेवायची;

असतो एकेकाला नाद देशभक्तीपर गीते म्हणण्याचा, म्हणून काय इथे मोठमोठ्याने भ्रमणध्वनीवर गाणी लाऊन त्यांचा वाटेल तो अपभ्रंश करायचा;

असतो एकेकाला नाद साहसी कृत्ते करण्याचा, म्हणून काय इथे फाजील साहसी कृत्यांचा आखाडा भरवायाचा;

असतो एकेकाला नाद सिगरेट फुकायचा, ही काय जागा आहे हिरोगिरी दाखवायची;

असतो एकेकाला नाद मैत्रिणीबरोबर फिरायचा, म्हणून काय इथे काही माकड चाळे करायचे;

असतो एकेकाला नाद काहीतरी जगावेगळे करण्याचा, म्हणून काय नियम धाब्यावर ठेऊन त्याचीच आणून नाचक्की करायची.

... माणुसकी म्हणजे काय असते हो !

 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.